देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा समारोप
वर्धा, दि.१२: ग्रामीण भागातील तरुणाईला कबड्डी या खेळाची विशेष आवड आहे. अतिशय कमी गुंतवणुकीत हा खेळ खेळता येतो. या खेळामध्ये प्रचंड चपळाई, संयम, आक्रमकतेची आवश्यकता असते. या खेळाच्या माध्यमातून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येथे केले.

कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ, नागपूर व अॅम्युचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते १२ मे या कालावधीत देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आज अंतिम सामना व बक्षिस समारंभ रामनगर येथील शहीद भगतसिंग मैदानावर आयोजित करण्यात आला. या स्पर्धेच्या समारोप सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
आदिवासी विकास मंत्री प्रा.डॅा.अशोक उईके, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार समीर कुणावार, आमदार सुमित वानखेडे, आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार सागर मेघे, सिने अभिनेते सुनील शेट्टी आदी यावेळी उपस्थित होते.
कबड्डी हा खेळ अतिशय प्राचीन आहे. महाभारतामध्ये या खेळाचा उल्लेख सापडतो. संत तुकारामांच्या अभंगात देखील कबड्डीचा उल्लेख आपल्याला आढळतो. देशाचा पारंपारिक खेळ म्हणून कबड्डीकडे पाहण्यात येते. कबड्डी या खेळाला देशी खेळामध्ये अत्यंत महत्त्व असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.







